अमृत आणि नगरोत्थान अभियानांच्या राज्यातील महत्त्वाच्या शहरांत उभारण्यात येणाऱ्या २८ प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी ई-भूमिपूजन करण्यात येणार आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. या ई-भूमिपूजन सोहळ्याचे त्या शहरांमध्ये वेबकास्टद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]

राज्यातील २८ शहरांमध्ये अमृत आणि नगरोत्थान अभियानांच्या माध्यमातून १ हजार ६२२ कोटी रुपयांचे विविध प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. नागरी क्षेत्रातील पाणीपुरवठा, हरितपट्टे, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी मुलभूत सुविधांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला आहे. एकाच वेळी २८ प्रकल्पांचा ई-भूमिपूजन सोहळा हा राज्यातील पहिलाच आगळावेगळा उपक्रम आहे. नगरोत्थान अभियानांतर्गत २० शहरांतील प्रकल्पांचे ई-भूमिपूजन करण्यात येणार आहे. चिखलदरा पाणीपुरवठा योजना, रोहा नदी सौंदर्यीकरण, मानवत पाणीपुरवठा योजना, सेनगाव पाणीपुरवठा योजना, देवळाली प्रवरा पाणी पुरवठा, दोंडाईचा वरवाडे पाणीपुरवठा, सिंदखेडा पाणीपुरवठा, मालेगाव उड्डाणपूल, राहता भूयारी गटार योजना, लोणावळा पाणीपुरवठा, रोहा भूयारी गटार योजना, पाचोरा भूयारी गटार योजना, अहमदपूर पाणीपुरवठा, जयसिंगपूर भूयारी गटार योजना, जामनेर भूयारी गटार योजना, चांदवड पाणीपुरवठा, इस्लामपूर भूयारी गटार योजना, हिंगोली भूयारी गटार योजना, फलटण भूयारी गटार योजना, गडचिरोली भूयारी गटार योजना, तर अमृत अभियानांतर्गत ८ शहरांतील प्रकल्पांचे ई-भूमिपूजन होणार आहे. त्यात अंबरनाथ पाणीपुरवठा योजना, कुळगाव-बदलापूर पाणीपुरवठा योजना, नाशिक मलःनिस्सारण योजना, हिंगणघाट पाणीपुरवठा, इचलकरंजी पाणीपुरवठा, अकोला, जळगाव आणि यवतमाळ पाणीपुरवठा योजना पहिला आणि दुसरा टप्पा आदी योजनांचा त्यात समावेश आहे. या भूमिपूजन सोहळ्यांचे वेबकास्टद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नागरीक उपस्थित राहणार आहेत.

[jwplayer sYbb755h-1o30kmL6]