“माझं आव्हान आहे, सरकार या क्षणी पाडून दाखवा. मुलाखत सुरु असताना सरकार पडल्याची बातमी येऊ दे” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान दिलं. सरकार अस्थिर करण्याचे जे प्रयत्न सुरु असतात, त्या संबंधीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी हे उत्तर दिले. “माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. हे सरकार कोसळणार नाही” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा- लोकसत्ताच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष येणार – उद्धव ठाकरे

लोकसत्ताच्या ७३ व्या वर्धापन दिन सोहळयात ते बोलत होते. नरिमन पॉईंट येथील एक्स्प्रेस टॉवरमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २०२० मधील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज असणाऱ्या लोकसत्ता वर्षवेधचे प्रकाशनही पार पडले.

आणखी वाचा- कोणी मला खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

“मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न नक्कीच होतं. आम्ही आव्हान देणारे आणि आव्हान स्वीकारणारे आहोत. जबाबदारीपासून पळणारे नाही” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
“हिंदुत्वाचं पेटंट भाजपाने घेतलेलं नाही. देशभरात हिंदुत्वाची पोकळी भरुन काढणं गरजेचं आहे. लोकांना वाटतं पर्याय पाहिजे, तेव्हा पर्याय निर्माण होतो.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.