प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. देशभरातून २२ मुलांची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात १० मुली आणि १२ मुलांचा समावेश आहे. दीड वर्षांपूर्वी परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून झेन सदावर्ते हिने १७ जणांची सुखरूप सुटका केली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण जखमी झाले होते. झेनने प्रसंगावधान दाखवत मुख्य स्विच बंद करून अग्निशामक दलास १६ व्या मजल्यावर येण्यास सांगितले. तोपर्यंत तेथील १७ जणांना तिने टॉवेल ओले करून दिले आणि त्याचा मास्कप्रमाणे वापर करून श्वास घेण्यास सांगून त्यांचे प्राण वाचविले होते. आकाश खिल्लारे याने नदीत बुडणाऱ्या मायलेकींचे प्राण वाचविले होते. दुधना नदीत बुडणाऱ्या एका महिलेचा मदतीसाठी टाहो ऐकताच आकाशने ७० फूट खोल नदीत उडी घेतली. महिलेसोबत एक मुलगी असल्याचे पाहिल्यानंतर त्याने प्रथम मुलीला वाचविले आणि नंतर पुन्हा नदीत उडी घेऊन महिलेलाही सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील दोन तर कर्नाटकमधील एका मुलासही राष्ट्रीय शौर्य पदकाने गौरविण्यात येणार आहे. केरळमधील १६ वर्षीय मोहम्मद मोहसीनचा समुद्रात बुडणाऱ्या तीन मित्रांना वाचविताना बुडून मृत्यू झाला. त्याला मरणोत्तर अभिमन्यू पुरस्कार देण्यात येणार आहे. कूपवाडातील सरताज मोहिद्दीन मुगल (१६) आणि बडगाममधील मुदसीर अशरफ (१९) यांनाही शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.