मुंबईखालोखाल साताऱ्यात सर्वाधिक गुन्हे

राज्यात अल्पवयीन मुलांकडून घडलेल्या गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण पोलिसांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनू शकते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अलीकडेच २०१६ मध्ये घडलेल्या गुन्हय़ांची सविस्तर माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार तुलनात्मकदृष्टय़ा २०१६ मध्ये बालगुन्हेगारी आणि सामान्य गुन्हेगारीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.

भीमा-कोरेगाव दंगलीनंतर मुंबईत उद्रेक घडला. यात मुंबई पोलिसांनी १६ अल्पवयीन युवकांवर कारवाई केली. शिवसेना उपविभागप्रमुख अशोक सावंत हत्येमध्ये एका अल्पवयीन युवकाचा सहभाग आहे.

दिल्लीचे निर्भयाकांड आणि मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणातही अल्पवयीन युवकांचा सहभाग होताच. या पाश्र्वभूमीवर या अहवालाने गंभीर वास्तव मांडले आहे. या अहवालानुसार २०१६मध्ये जबरी चोरी वगळता हत्या, हत्येचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, विनयभंग, चोरी, दरोडा, घुसखोरी, फसवणूक, अपहरण,  गैरकायद्याची मंडळी जमवणे, दंगल, अनैसर्गिक गुन्हे या सर्व शीर्षकांखालील गुन्हे २०१४, २०१५पेक्षा जास्त नोंद झाले. अहवालानुसार २०१६मध्ये अल्पवयीन युवकांविरोधात ६२३९ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१५मध्ये गुन्हय़ांची संख्या ५४८२ इतकी होती. युवकांच्या गुन्हेगारीत राज्यातील पोलीस आयुक्तालये आणि जिल्ह्यांपैकी मुंबई (९०१), सातारा (८११), पुणे (७२७), नागपूर (३६४) आणि ठाणे (३४४) अग्रेसर आहेत.

१६ वर्षांचा युवक प्रौढ गुन्हेगारच

बालगुन्हेगारी रोखली नाही तर भविष्यात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे अशक्य असेल, अशा प्रतिक्रिया अनुभवी अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतात. १६ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकाला प्रौढ मानून त्यानुसार कारवाई केली जावी, या मताशी माजी आयपीएस अधिकारी सहमत आहेत.