तौते चक्रीवादळाचा कोकण कीनारपट्टी भागाला चांगलाच फटका बसला. या तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावार विरोधक टीका करत आहेत. ‘३ तासाच्या कोकणदौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींच सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका” अशी फिरकी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “देवेंद्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, ३ तासाच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या, कितींच सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका, आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं!”


इतर विरोधी नेत्यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी करण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाहणी करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री तिन तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय सांगत मोदींवर निशाणा साधला. “मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. तिन तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,” असंही ते म्हणाले.