छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ‘ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना आहे. रुग्णालयात १० जण दाखल असून एक रुग्ण आयसीयूत आहे. मात्र सध्या ते धोक्याबाहेर आहेत. चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेतच पण याशिवाय घटनेला प्राथमिक जबाबदार कोण आहे? याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत’.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असं म्हटलं. ऑडिट करताना ज्यांनी हिरवा कंदील दाखवला असेल त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे त्यांची पुनर्तपसाणी करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.