वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने त्रस्त झालेल्या शेतक-यांना आता दिलासा मिळाला आहे. शेतक-यांना पुढील तीन महिने दिवसाच्या वेळी अखंड वीज पुरवठा करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले आहेत.
शेतक-यांच्या वीजेविषयीच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांना पुढील तीन महिने दिवसा १२ तास अखंड वीज पुरवठा करा असे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरव्दारे ही माहिती दिली. या निर्णयामुळे शेतक-यांना दिवसा शेतीसाठी जलयुक्त शिवारांतर्गत तयार झालेल्या शेततळ्यांमधून पाणी घेणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वात कमी पाऊस झालेल्या भागांची यादी तयार करण्याचे आदेशही दिले. स्वतःची सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतक-यांचा यात समावेश केला जाईल. याशिवाय पोलिस अधिका-यांनी प्रत्येक जिल्ह्यात महावितरणसाठी दोन ते तीन पोलीस स्टेशन सुरु करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीविषयीचे गुन्हे दाखल करणे शक्य होणार आहे. महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरीवर नजर ठेऊन कारवाई करावी. यातून वीजचोरीमुळे होणारे नुकसान भरुन निघेल आणि त्याचा फायदा शेतक-यांना देता येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सौरउर्जेवर चालणा-या फिडरचा आढावा घेतला. महावितरणने तातडीने प्रायोगिक प्रकल्प सहा महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
CM @Dev_Fadnavis directs to provide uninterrupted power supply for agricultural pumps and that too in the day time for next 3 months.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 6, 2016
CM @Dev_Fadnavis also asked officials to prioritise areas with less rainfall and where farmers don't have their own irrigation facilities.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 6, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 5:06 pm