मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणे, माझ्या राज्याचा आणि राजधानीचा अपमान करणाऱ्यांचे हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात बार आणि रेस्तराँ सुरु झाले तरीही मंदिरं बंद का असा प्रश्न विचारत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचीही आठवण करुन दिली आहे. या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खास शब्दांमध्ये टोलेबाजी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाला उत्तर दिलं आहे.

“माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचं हसत-खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. प्रार्थनास्थळं उघडण्याबाबतच्या आपल्या विनंतीचा सरकार नक्की विचार करु” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना उत्तर

आणखी काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

आणखी वाचा- …तर प्रत्येक भाषणाच्या सुरूवातीला हिंदूह्रदयसम्राट म्हणा; ठाकरेंना चंद्रकांत पाटील यांचं आव्हान

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर कंगनाने त्याचा बळी नेपोटिझममुळे गेला आहे असा आरोप केला. तर काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी कडाडून विरोध केला होता. संजय राऊत आणि कंगना यांच्यात तर ट्विटर वॉर रंगलं होतं. भाजपाने मात्र कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यातही वाद झाला होता. त्या सगळ्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आणि भाजपाला उत्तर दिलं आहे.