यू वाय अॅव्हिएशन कंपनीने जबरदस्तीने विमानाची चाचणी घेतली. मारिया झुबेर यांनी या खराब हवामानामुळे विमानाची चाचणी घेऊ नका असे सांगितले होते तरीही या विमानाची चाचणी घेण्यात आली. कंपनीच्या हट्टामुळेच मारिया झुबेर आणि इतरांचा घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्यू झाला असा आरोप मारिया झुबेर यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला. घाटकोपर विमान दुर्घटनेतील पायलट मारिया झुबेर यांच्यासह एकूण पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर मारिया झुबेर यांचे पती अॅडव्होकेट प्रभात कथुरिया यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. मारिया झुबेर आणि प्रदीप राजपूत यांनी खराब हवामान असल्याचे सांगितले होते मात्र कंपनीने आग्रह केला आणि त्याचमुळे या सगळ्यांचा मृत्यू झाला असा आरोप कथुरिया यांनी केला आहे.

मारिया झुबेर यांच्याकडे एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. खराब हवामान असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. मात्र युवाय कंपनीने आग्रह धरल्याने आज सकाळी ८ वाजताच त्यांनी घर सोडले होते. मी मारियाला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुठे आहेस? असा मेसेज पाठवला होता मात्र या मेसेजला कोणाताच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि त्यानंतर विमान अपघाताची बातमीच समोर आली असेही प्रभात यांनी म्हटले आहे.

घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीचे होते.  वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला. आता मारिया झुबेर यांचे पती प्रभात कथुरिया यांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.