तिकिटासाठी सुटे पैसे द्या, नाही तर बसमधून उतरा असे प्रवाशांना ठणकावून सांगणाऱ्या वाहकापासून, गाडी बस थांब्यावर न थांबलेल्या चालकापर्यंत गेल्या चार महिन्यांत बेस्ट प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस पडला आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यांत बेस्ट प्रशासनाकडे वाहक-चालकांविरोधात ३९१ तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहे. यात ‘चिल्लर’ वादाचे प्रमाण अधिक असल्याचे समजते. सध्या बेस्टकडून चार हजारांहून अधिक बसगाडय़ा चालवल्या जातात. यातून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे २८ लाखांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांत ही संख्या लाखोंनी घटली. याचे मुख्य कारण बेस्टचे भाडे शेअर रिक्षा-टॅक्सींच्या तुलनेत अधिक असल्याचे अधोरेखित केले जात आहे. मात्र प्रवाशांकडे उद्धटपणे वागणाऱ्या वाहक आणि चालकांमुळेही बेस्टचे प्रवासी दुरावल्याचा आरोप बेस्ट समितीचे सदस्य करत आहेत. यात सुटय़ा पैशांवरून होणाऱ्या वादाचे प्रमाण अधिक आहे. बेस्टकडून वाहकाला १०० रुपयांची चिल्लर (सुटे पैसे) दिली जाते. मात्र प्रवाशांची संख्या पाहता वाहकाला सुटे पैसे देताना हात आखडता घ्यावा लागतो. यात अनेकदा प्रवासी आणि वाहकांत वाद होतात.