संपूर्ण मुंबईमधील कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीमध्ये टाकण्यात येत असल्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नगरसेवकांमध्ये वाद पेटला.
संपूर्ण मुंबईतील कचरा आमच्या येथील कचराभूमीतच का टाकण्यात येतो असा आक्षेप पूर्व उपनगरांतील नगरसेवकांनी घेतल्यामुळे स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत भडका उडाला. शहर आणि पश्चिम उपनगरांतील कचऱ्याची तेथेच विल्हेवाट लावावी अशा मुद्दा उपस्थित करीत पूर्व उपनगरांतील नगरसेवकांनी प्रशासनालाही धारेवर धरले. त्यामुळे भविष्यात कचऱ्यावरुन नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.कांदिवली, जोगेश्वरी, बोरिवली आणि दहिसर परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रांमध्ये गोळा केला जाणारा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीमध्ये अंतिम विल्हेवाट लावण्यासाठी वाहून नेण्याच्या कंत्राटाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. या प्रस्तावावरुन पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नगरसेवकांमध्ये भडका उडाला.मुलुंड कचराभूमी बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने न्यायालयाला सांगितले आहे. कांजूर कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली आहे. तशीच अवस्था देवनार कचराभूमीची आहे. असे असतानाही संपूर्ण मुंबईतील कचरा या तीन कचराभूमीत टाकण्यात येत आहे.