काँग्रेसवर टीका अन् पाठिंबाही हवा

‘‘काँग्रेस तर बुडालीच, पण सोबत आम्हालाही बुडविले किंवा काँग्रेसबरोबर राहिल्याने पाच वर्षांत सर्वाधिक आमचे नुकसान झाले,’’ असा थेट हल्ला प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये चढविल्याने राष्ट्रवादीच्या मनात काय आहे, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली असली तरी या नाराजीमागे विधान परिषद निवडणुकीचा पदर असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने डोळे वटारल्यावर काँग्रेसचे दिल्लीतील नेते नमते घेतात हा इतिहास लक्षात घेता आताही राष्ट्रवादीच्या मनाप्रमाणे सारे होते का, याची उत्सुकता आहे.

अकोला आणि वाशिम या दोन ठिकाणी झालेल्या मेळाव्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच  पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नुकसान केले तसेच पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले, असा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या अन्य नेत्यांशी उत्तम संबंध राखणारे प्रफुल्ल पटेल काँग्रेसच्या विरोधात बोलू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. नरेंद्र मोदी यांच्याशीही चांगले संबंध असणाऱ्या पटेल यांनी काँग्रेसला लक्ष्य केल्याने राष्ट्रवादीला भाजपचे वेध लागले का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

दिल्लीची भूमिका निर्णायक

शरद पवार यांनी डोळे वटारल्यावर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी माघार घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलीकडेच विधान परिषदेच्या दोन जागांवर राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे दिल्लीचे नेते कोणती भूमिका घेतात यावरही अवलंबून आहे. राष्ट्रवादीची पूर्वीप्रमाणे ताकद नसून,  त्यांना काँग्रेसची गरज आहे, असे राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

ल्ल विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी सहा जागा या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील आहेत. यापैकी चार मतदारसंघांत राष्ट्रवादीचे, तर एका मतदारसंघात काँग्रेस् आमदार आहे. सहापैकी पाच जागांवर  पाठिंबा द्यावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. सांगली-सातारा, यवतमाळ किंवा गोंदिया-भंडारा हे राष्ट्रवादीकडील मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विख , डॉ. पतंगराव कदम यांनी मांडली  ल्लसहापैकी प्रत्येकी तीन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीने लढवाव्यात, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत मांडली आहे. जून महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला झुकते माप देण्यात आले होते, अशीही तक्रार राज्यातील नेत्यांनी केली आहे. भंडारा-गोंदिया या पटेल यांच्या जिल्ह्य़ातील जागा राष्ट्रवादीकडे असली तरी काँग्रेसचे आमदार गोपाळ अगरवाल यांनी मुलाला रिंगणात उतरिवण्याची तयारी केली आहे.

राष्ट्रवादीचे सारेच सोयीचे असते. पृथ्वीराजबाबांनी सिंचनाच्या सद्य:स्थितीबाबत तेव्हा श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश दिला होता. तसेच आरोपांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा आदेश कोणी दिला, याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संशोधन करावे.

डॉ.रत्नाकर महाजन, प्रवक्ते, काँग्रेस