काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात  लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपाची चर्चा सुरू आहे. मागील  बैठकांमधून दोन्ही पक्षांचे ४० जागांवर एकमत झाले आहे. मात्र पुणे, नगर, रावेर, जालना, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधदुर्ग, नंदूरबार आणि यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघांवर दोन्हीकडून दावा करण्यात येत असल्याने पुढची चर्चा अडली आहे.

पुणे व नगरवरून तर मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक होणार आहे.  राष्ट्रवादीपेक्षा एक-दोन जागा तरी जास्त पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा समसमान म्हणजे २४-२४ असे जागावाटप करावे, असा आग्रह आहे.  काही मतदारसंघांची अदलाबदल करायची आहे. त्यावरूनही वाद सुरू झाला आहे. काही मतदारसंघ दोन्ही पक्षांतील बडय़ा नेत्यांसाठी व नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांसाठी मागितले जात आहे. त्यातून पुणे व नगरसारख्या जागेवरून निवडणुकीच्या आधीच दोन्ही काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे.

..तर पश्चिम महाराष्ट्रातून अस्तित्व संपेल

पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेचे दहा मतदारसंघ आहेत. या पूर्वी झालेल्या आघाडीत त्यापैकी पुणे, सांगली व सोलापूर हे तीनच मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आले होते. आता त्यातील पुणे राष्ट्रवादीला दिला, तर पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे अस्तित्वच संपेल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने निदर्शनास आणले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघही आडमार्गाने राष्ट्रवादी मागत आहे. मात्र काँग्रेस ही जागाही सोडायला तयार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने या आठ जागांच्या वाटपावर चर्चा होणार आहे, असे सांगण्यात आले.