परभणीतील मुस्लीमबहुल प्रभागांपाठोपाठ भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या अल्पसंख्याकबहुल महापालिकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाने मुस्लीम समाज राज्यात काँग्रेसला कौल देत असल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपला रोखण्यासाठी मुस्लीम मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभे राहात असल्याचा निष्कर्ष त्यातून काढला जातो.

काँग्रेसला भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळाले. मालेगावमध्ये पक्षाला सर्वाधिक यश मिळाले. गेल्याच महिन्यात झालेल्या परभणी आणि लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. मालेगावमध्ये काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस- जनता दल आघाडीला जागा मिळाल्या आहेत. यावरून मुस्लीम वस्त्यांमध्ये काँग्रेसचा पर्याय स्वीकारला जात आहे. मालेगावमध्ये राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी भिवंडीमध्ये राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नाही.

महाराष्ट्रात ११ टक्क्य़ांपेक्षा जास्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. मुस्लीम समाज पारंपारिकदृष्टय़ा काँग्रेसबरोबर असायचा. पण मधल्या काळात मुस्लीम समाज काँग्रेसपासून दुरावला होता. समाजवादी पार्टी किंवा आता एमआयएमला पाठिंबा मिळत गेला. पण परभणी, लातूर, भिवंडी आणि मालेगावचा मुस्लीम प्रभागांमधील कौल काँग्रेसला मिळाला आहे. हा बदलता कौल राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा मानला जातो. मोदी सरकारच्या अल्पसंख्याक धोरणाच्या विरोधात काँग्रेसने अल्पसंख्याकबहुल विभागांमध्ये प्रचार केला. त्याचा राजकीय फायदा निवडणूक निकालातून बघायला मिळाले. परभणी, मालेगाव किंवा भिवंडी स्थानिक नेतृत्व भक्कम असल्यास त्याचा फायदा होतो, असे काँग्रेसचे गणित आहे.

मुस्लीम मतदारांच्या मतविभाजनाचा भाजप किंवा शिवसेनेला नेहमीच फायदा होतो. भाजपला रोखायचे असल्यास एकच पर्याय असला पाहिजे, अशी भावना मुस्लीम समाजात बळावत आहे. त्याचा काँग्रेसला फायदा होऊ लागल्याचे मानले जाते. उत्तर प्रदेशात भाजप सत्तेवर आल्यावर अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील धोरणे किंवा गोरक्षकांची भूमिका यातून अल्पसंख्याक समाजात वेगळा संदेश गेला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होऊ लागला असल्याचे मानले जाते. गेल्याच आठवडय़ात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ममता बँनर्जी यांना मिळालेले यश किंवा महाराष्ट्रात काँग्रेसला मुस्लीमबहुल भागात चांगल्या जागा यावरून भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्याकरिता अल्पसंख्याक समाज प्रबळ पर्यायांच्या शोधात असल्याचे मानले जाते. त्यातूनच राज्यात काँग्रेसला यश मिळाले आहे.

मधल्या काळात महाराष्ट्रातील मुस्लीम समाज काँग्रेसपासून दुरावला होता. पण अन्य पक्षांना मते म्हणजे भाजपला मदत हा संदेश अल्पसंख्याक समाजात रुढ झाला आहे. एमआयएमचे सारेच राजकारण हे भाजपला पोषक असे आहे. देशात सत्ताधारी भाजपकडून अल्पसंख्याकांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे मुस्लीम मतदार आता पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळू लागल्याचे अलीकडच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.    – खासदार हुसेन दलवाई, काँग्रेस 

परभणी, लातूर, मालेगाव किंवा भिवंडी या चार पालिकांच्या निकालांवरून मुस्लीम समाज काँग्रेसकडे वळू लागला हा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. मालेगावमध्ये आम्ही सात जागाजिंकल्या. काँग्रेसने वर्षांनुवर्षे फसगत केल्याची उलट मुस्लीम समाजात भावना निर्माण झाली आहे. एमआयएमचे संघटन बळकट नसल्याने आम्हाला काहीशा मर्यादा येतात.   – आमदार एम्तियाज जलिल, एमआयएम