संसदेतील सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या घडामोडीनंतर काँग्रेसने देशभरात आपल्या निवडणूक प्रचाराची नवी टॅगलाईन निश्चित केली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर ही नवी टॅगलाईन तयार झाली असून त्याचे दर्शन रविवारी मुंबईतील अंधेरी भागात पोस्टरद्वारे घडले. नफरस से नहीं, प्यार से जीतेंगे… या टॅगलाईनसह राहुल-मोदींच्या गळाभेटीचा फोटोही पोस्टरवर लावण्यात आला आहे. अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी सुरु असल्याची चर्चा आहे.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जे काही केले त्यावर जनमाणसांत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. देशभरात सध्या ज्या प्रकारे द्वेषाचे वातावरण दिसत असून लोकांना जमावाकडून मारहाण होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या भाषणातून आणि पंतप्रधान मोदींच्या गळाभेटीतून भाजपाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी संसदेत वापरलेल्या आपल्या शब्दांची टॅगलाईन करुन मुंबई काँग्रेस ती मुंबईतील रस्त्यांवर घेऊन गेले आहेत. यासाठी काँग्रेसने खास ऑनलाइन आणि ऑफलाइन पोस्टर्स तयार केले आहेत. सोशल मीडियावरुन हे पोस्टर वेगाने व्हायरल झाले आहे. तेच आता मुंबईतील रस्त्यांवर फ्लेक्सच्या रुपानेही पहायला मिळत आहे. यामध्ये मोदी आणि राहुल यांच्या गळाभेटीच्या फोटोसह मोठ्या अक्षरांमध्ये नफरत से नही प्यार से जितेंगे असे शब्द लिहिण्यात आले आहेत.