काँग्रेस नेते राहुल गांधींकडून संरक्षण विभागाबाबत अपप्रचार सुरू  असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा नुकताच लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे. अपप्रचार भविष्यातही सुरू राहिल्यास लोकसभेतील सध्याच्या ४० जागाही टिकविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागेल, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी २०१८ मध्येही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी या कंपन्यांची उत्पादन क्षमता कमी करत असल्याची चुकीची माहिती दिली होती.  वास्तविक केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीसाठी एचएएल या कंपनीसमवेत एक लाख कोटींचे कंत्राट केले आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते. त्यांची वक्तव्ये म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला बदनाम करण्याचा प्रकार असून तो निंदनीय असल्याचे पाटील यांनी सांगितले.