आचार्य विनोबा भावे यांच्या कुटुंबीयांनी भूदान चळवळीत दिलेला रायगड जिल्ह्य़ामधील गागोदे गावातील १६५ हेक्टर क्षेत्र असलेला डोंगर गावकीने ७० कोटी रुपयांना विकायला काढला आहे. एका प्रसिद्ध उद्योगपतीचा या डोंगरावर डोळा असून तो उद्योगपतीला मिळवून देण्यासाठी काही मंडळी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र हा डोंगर गावकीचा की ग्राम मंडळ, गागोदेचा यावरून वाद सुरू झाला आहे. ग्राम मंडळामुळे डोंगर विक्रीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचाही वापर केला जात आहे. मात्र सर्वोद्याच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती मोहीम राबवून या डोंगरविक्रीला विरोध दर्शविला आहे.सध्या हा डोंगर ग्राम मंडळ, गागोदे बुद्रुकच्या नावावर असला तरी विनोबांचे चुलतबंधू रघुनाथ गोपाळ भावे यांनी १९५८ रोजी गावाच्या पंचांना तीन हजार रुपयांना हा डोंगर विकून टाकला होता. परिणामी, खरेदी खतावर शंकर पाटील, महादू पोसू पाटील, गणपत हिरू पाटील, गणपत रामा सानप, विठ्ठल अनाजी जगताप, नारायण शंकर जठार, देवलिंग तातलिंग जंगम या पंचांची नावे नमूद करण्यात आली. सातबाराच्या उताऱ्यावरही त्यांचीच नावे आहेत. दरम्यानच्या काळात हा डोंगर ग्रामदानात देण्यात आल्याने तो ग्राम मंडळ, गागोदेच्या नावावर आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या डोंगरावर वनेतर कामास बंदी घातली असून वृक्ष लागवडीखेरीज काहीही येथे होऊ शकत नाही. गेली काही वर्षे या डोंगरावर भाजीपाला पिकवून अनेक कुटुंबीयांच्या संसाराचा गाडा पुढे रेटला. पण डोंगर विक्रीला काढल्यानंतर ही मंडळी दहशतीपोटी गप्प आहेत.गावकीला हाताशी धरून हा डोंगर खरेदी करण्याचा घाट एका उद्योगपतीने घातला आहे. या विक्रीतून ७० कोटी मिळणार असल्याने सातबाराच्या उताऱ्यावर नावे असलेल्यांपैकी काही मंडळी खूश झाली आहेत. दरम्यान, डोंगर विक्रीच्या विरोधात आपण जनजागृती करीतच राहणार, अशी भूमिका सवरेदयी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.गागोदेचा इतिहास आणि विनोबा*पेशव्यांचे सरदार नरसिंग कृष्णराव भावे यांना अलिबागचे बाबूराव आंग्रे यांनी १८०७ मध्ये गागोदे ब्रुद्रुक हे गाव इनाम म्हणून दिले होते. त्यामुळे आचार्य विनोबा भावे यांचे इनाम गाव म्हणूनच गागोदे प्रसिद्ध आहे. *विनोबांच्या जन्मघरात बसूनच ग्रामस्थांनी ३ फेब्रुवारी १९६३ रोजी हे गाव ग्रामदान झाल्याचे घोषित केले. ११ सप्टेंबर १९७१ रोजी कायदेशीररीत्या हे ग्रामदानी गाव झाले. *गावातील ९५ पैकी ७२ जमीन मालकांनी ६०० एकर २० गुंठे जमीन ग्रामदानात दिली आणि १५९ ग्रामस्थ ग्रामदानात सहभागी झाले. गागोदेतील १६५ हेक्टर डोंगरक्षेत्र भावे कुटुंबीयांच्या मालकीचे होते. *त्यापैकी ६३ एकर जमीन भावे कुटुंबीयांनी ३१ भूमिहीन कातकरी आदिवासींना तर उर्वरित जमीन भूदान चळवळीत देऊन टाकली. *एकूण जमिनीपैकी ६० टक्के जागा ग्रामदानात वळती होणे गरजेचे असल्यामुळे भूदान मंडळाने हा डोंगरही ग्रामदानात आला. आणि सदरहू डोंगर तेव्हापासून ते आजपर्यंत ग्राम मंडळ, गागोदे बुद्रुकच्या नावावर आहे.-प्रसाद रावकर