सततच्या टाळेबंदीमुळे सर्वच लोक जीवनावश्यक वस्तूंच्याच खरेदीला प्राधान्य देत असल्यामुळे पर्स, घडय़ाळे, छोटे दागिने, गॉगल आणि चप्पलविक्री करणाऱ्या छोटय़ा व्यावसायिकांची परवड सुरू आहे. कर्मचारी-कारागिरांना पगार देणे तर दूरच, पण घरखर्च भागवणेही अवघड झाले आहे. लेडीज पर्स, बॅगा, इमिटेशन ज्वेलरी दुकानदारांचा १० टक्केहीव्यवसाय सध्या होत नाही. त्यामुळे दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, वीज देयक आणि इतर खर्च निघणेही कठीण झाले आहे. टाळेबंदीपूर्वी साधारणपणे दिवसाकाठी किमान ५० ते ६० बॅगांची विक्री होत असे. सध्या ३ ते ४ बॅगांची विक्री होते. यावरून या व्यावसायिकांचे जगणे किती कठीण झाले आहे, याची कल्पना येते. ‘‘अनेक व्यावसायिक कामगारांना त्यांचा घरखर्च भागेल इतकाच पगार देत आहेत. आमचा व्यवसाय महिला ग्राहकांवर अवलंबून आहे, पण त्या घराबाहेर पडत नाहीत,’’ अशी अगतिकता बोरिवली आणि ठाणे येथील ‘चॉइस अनेक्स’चे प्रफुल्ल जोशी यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने कर्जाव्यतिरिक्त आर्थिक मदत देऊन या व्यवसायाला आधार द्यावा, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. ठाण्यात खरेदी थंडच टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंची खरेदी करणे टाळले जात आहे. महिला पर्स आणि बॅगांची खरेदी करीत नसल्याची माहिती ठाण्यातील एका विक्रेत्याने दिली. प्रवासावरील निर्बंधांमुळे दुकाने ओस आहेत. पर्स आणि बॅगांचा ७० टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे, असे जांभळीनाका परिसरातील पर्स विक्रेते मुन्नागिरी गोस्वामी यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे ठाण्यात अनेक नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. उल्हासनगरच्या दप्तरनिर्मितीला घरघर ठाणे जिल्ह्य़ातील दप्तरनिर्मिती आणि विक्रीची मोठी बाजारपेठ उल्हासनगरात आहे. मात्र, शाळा-महाविद्यालये आणि दुकाने बंद असल्याने दप्तरे, बॅगांची विक्री थांबली आहे. दर वर्षी जानेवारीपासून बॅगनिर्मिती सुरू करण्यात येते. फेब्रुवारीत बॅगांची मागणी नोंदवली गेल्याने निर्मितीचे कामही सुरू केले गेले. त्यानंतर लागलेल्या टाळेबंदीमुळे तयार मालाची धूळधाण झाली आहे, असे कालिका थैला भंडारचे दीपक शाह यांनी सांगितले. पुण्यातील विक्रेतेही मेटाकुटीस ‘टाळेबंदीमुळे १७ मार्च ते १६ जून असे तीन महिने दुकाने बंद होती. दुकान असलेला भाग प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर काही दिवसांनी दुकान उघडण्यास परवानगी मिळाली. या काळात घरखर्च कसाबसा भागवला. दुकानात असलेल्या कामगारालाही मदत केली. मात्र, पुन्हा टाळेबंदी लागू झाली आणि दुकान बंद ठेवावे लागले, अशी व्यथा पुण्यातील ‘जनता शू मार्ट’चे नीलेश कांबळे यांनी मांडली. कामगारांना कामावर ठेवणे आता शक्य नाही. पुढील सहा महिने घरखर्च चालवण्याएवढी कमाई होईल, असे गृहीत धरले आहे. सरकारने दुकानांचे भाडे माफ करून लहान दुकानदारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही कांबळे यांनी केली. कोल्हापुरी जोडेनिर्मिती संकटात देशात ‘सर्वोत्तम ब्रँड’ अशी ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पल व्यवसायाचे हजार कोटींचे नुकसान झाले आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ चप्पलनिर्मिती आणि विक्री ठप्प आहे. सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक कलाकार, मजूर, कारागीर, व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. कोल्हापुरी जोडय़ांची खरेदी प्रामुख्याने पर्यटक, भाविक करतात; परंतु आता प्रवास, पर्यटनावरच बंदी असल्याने हा व्यवसाय संकटात आहे. बॅगनिर्मिती उद्योगाची धूळधाण : उल्हासनगर शहरात दप्तर आणि बॅगनिर्मितीचे सुमारे एक हजार छोटे कारखाने आहेत. पवई चौक, श्रीराम चौक आणि खडेगोळवली येथे हे कारखाने मोठय़ा प्रमाणावर आहेत. तर कॅम्प एक, दोन आणि तीन भागांत या बॅगेची विक्री करणारी मोठी दुकानेही आहेत. त्यांच्यावर टाळेबंदी उठल्यानंतरही टाळे लावण्याची वेळ ओढवू शकते, अशी त्यांची आजची अवस्था आहे. अडचणी काय? * ‘सम-विषम’ नियमामुळे विक्रीवर परिणाम. * अनेक भागांत टाळेबंदी; दुकानेही बंदच. * माल पडून राहिल्याने खराब होण्याची भीती. * कर्मचारी, कारागीरांचे पगार भागविणे अवघड. मागण्या काय? * किमान भाडे भरण्यासाठी सरकारने अर्थसाह्य़ द्यावे. * मुंबईतील लोकल रेल्वेसेवा सुरू करावी. * दररोज दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. * दुकानाचे भाडे आणि वीज देयक माफ करावे. दादर परिसरातील महिला खरेदीसाठी आल्या तरी त्या बांगडय़ा आणि मंगळसूत्र याव्यतिरिक्त खरेदी करीत नाहीत. सौंदर्य प्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी हा हौशी खरेदीचा भाग असतो; परंतु करोना संसर्गाच्या भीतीने ग्राहक बाजारात फार वेळ थांबत नाहीत. त्यामुळे दिवसभरात पाचशे- सहाशे रुपयांचाही व्यवसाय होत नाही. - ललित सोलंकी, श्री वंदना आर्ट ज्वेलर्स, दादर, मुंबई कोल्हापुरी जोडय़ांचा जागतिक पातळीवर लौकिक असतानाही विक्रीच थंडावल्याने कारागीर, विक्रेते अडचणीत आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना बांधकाम कामगारांप्रमाणे दरमहा अर्थसाह्य़ देण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. - अशोक गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर चप्पल क्लस्टर * संकलन : अमर सदाशिव शैला, आशिष धनगर, प्रथमेश गोडबोले, दयानंद लिपारे