शिवाजी पार्क येथे सभा घेण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयावर ताशेरे ओढणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर केंद्रीय विधी व न्याय तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाने उत्तर दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
राज यांच्याविरुद्ध अ‍ॅड्. एजाज नक्वी यांनी केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यावर ताशेरे ओढणाऱ्या राज यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी नाकारून उच्च न्यायालयाने पक्षपाती निर्णय दिल्याचा आरोपही राज यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन केला होता. शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्रात मोडत असल्याने न्यायालयाने मनसेला तेथे सभा घेण्यास परवानगी नाकारली होती.