गणेशोत्सव काळात समाजकंटक हे समाजात अस्थिरता माजविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जनतेने पोलिसांना सहकार्य करावे व संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत केले. वर्षां या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी सोमवारी गणरायाची स्थापना झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर टीका केली आहे. त्याबाबत विचारता, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानीही सोमवारी गणरायाचे आगमन झाले. देशाच्या शांततेसाठी व सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी आपण गणरायाला साकडे घातले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.