सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा सुशांतच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञा पत्र सादर केलं. दरम्यान या प्रकरणी आता काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचं एक प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलं आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते. फेब्रुवारी महिन्यातच सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी नोंदवली होती असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. मात्र अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळं बॉलिवूड हादरलं. मात्र या घटनेनंतर सुशांतचा मृत्यू हा सिनेसृष्टीतली गटबाजी आणि घराणेशाही यामुळे झाला असाही एक आरोप झाला. या संदर्भातल्या बातम्या समोर आल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृह खात्याने लक्ष घातलं आणि पोलिसांनी हा अँगल तपासून पाहण्यासाठी आत्तापर्यंत ४० जणांची चौकशी केली आहे. दरम्यान हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचं नाव आहे. तिची या प्रकरणात शनिवारी चौकशी करण्यात आली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप आता सुशांतच्या वडिलांनी केला आहे.