करोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील ३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला. ३३  डॉक्टर मुंबईतील आहेत.

कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नोंद सरकारने ठेवलेली नाही असा खेद व्यक्त करत डॉक्टरांच्या मृत्यूची आकडेवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केली आहे.

या डॉक्टरांना शहिदाचा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी ‘आयएमए’ने केली आहे.

‘आयएमए’च्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक म्हणजे १२ डॉक्टरांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. या खालोखाल ठाणे, भिवंडी, कल्याण या भागांत आठ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद आहे. मृतांमध्ये ३३ टक्के डॉक्टर ६० वर्षांवरील, तर ५२ टक्के ५० ते ६० वयोगटांतील आहेत. ४० वर्षांखालील चार डॉक्टरांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

तमिळनाडूत सर्वाधिक मृत्यू

देशभरात करोनाने बळी घेतलेल्या डॉक्टरांची संख्या ३८२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक डॉक्टरांच्या मृत्यूची (६३) नोंद तमिळनाडूत झाली आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (४२), उत्तर प्रदेश (४२) आणि गुजरात (३९) अशी संख्या आहे.