दशकभरातील उच्चांक; करोनाकाळात आयात घटल्याचा परिणाम

करोनामुळे अर्थव्यवस्था कोंडलेली असताना देशभरातील नागरिक सध्या विविध वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे त्रस्त आहेत. त्यातच खाद्यतेलांच्या किमतींमध्ये ११ वर्षांतील उच्चांकी वाढ नोंदविली गेली. भारत खाद्य तेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नसल्याने शेंगदाणा, वनस्पती, सोया, सूर्यफूल, पाम तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. करोनाकाळात आयातीत घट झाल्याचाही हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खाद्यतेलांच्या दरवाढीबाबत सोमवारी अन्न व सार्वजनिक वितरण खात्याने संबंधितांची बैठक घेतली, त्यात राज्यांना व खाद्यतेल उद्योगांना तेलाच्या किमती तातडीने खाली आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. २०१९-२०२० या वर्षात नोव्हेंबर-ऑक्टोबर या काळात भारतात वनस्पती तेलाचे उत्पादन ८५ लाख टन झाले तर १३.५ मेट्रिक टन तेल आयात केली गेली. त्यात ७ मेट्रिक टन पामतेल, ३.५ मेट्रिक टन सोयाबीन तेल व २.५ मेट्रिक टन सूर्यफूल तेल आयात करण्यात आले होते.

देशाची खाद्यतेलाची साठ टक्के मागणी ही आयातीतून भागवली जाते, त्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय दरावर ठरत असतात. कच्च्या पाम तेलाची किंमत मलेशियाच्या बाजारात २५ मे रोजी टनाला ३८९० रिंगीट (तेथील चलन) होती. ती वर्षापूर्वी २२८१ रिंगीट होती. सीबीओटीमध्ये सोयाबीन तेलाची किंमत २४ मे रोजी टनाला ५५९.५१ अमेरिकी  डॉलर होती. गेल्या वर्षीच्या याच काळात ही किंमत ३०६.१६ डॉलर होती.

 

किती महाग?

पाम तेलाची किंमत सर्वाधिक वाढली असून किरकोळ किंमत किलोला मे महिन्यात १३१ रुपये ६९ पैसे होती. हा अकरा वर्षांतील उच्चांक असून गेल्या वर्षी याच काळात ही किंमत ८८ रुपये २७ पैसे होती. मोहरीच्या तेलाचे किरकोळ दर मे महिन्यात १६४ रुपये ४४ पैसे होते तेच दर गेल्या मे महिन्यात ११८ रुपये २५ पैसे होते. शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफुलाच्या तेलाच्या दरांमध्ये या मे महिन्यात १९ ते ५२ टक्के दरवाढ झाली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा विभागाने दिली.

कारणे काय?

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यफूल, पाम आणि सोयाबीन तेलाचे दर वाढत आहेत. सूर्यफूल युक्रेन, पामतेल मलेशिया आणि सोयाबीन तेलाची सर्वाधिक आयात अमेरिकेतून होते. करोनाचा प्रादुर्भाव, वातावरण बदल, मजुरांची कमतरता यामुळे खाद्यतेलांचे दर वाढल्याची माहिती मुंबईतील तेलाचे घाऊक व्यापारी जतीन चावला यांनी दिली.

थोडी माहिती…

जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असलेल्या भारतात दरवर्षी दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. आपल्या देशाची गरज २२५ लाख टन आहे. भारतात फक्त ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होते.

जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने भारतातील वेगवेगळ्या राज्यांत तेलाचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. सूर्यफूल, मोहरीचे तेल, पामतेल, वनस्पती तसेच सोयाबीन तेलाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशभरातील वनस्पती तेलाचे उत्पादन फार झालेले नाही आणि तेलाची आयातही कमी झाली, त्याचा हा परिणाम आहे. – अमर शहा, तेल व्यापारी