मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवासी संख्येत विषाणूभयाने घट मुंबई : मुंबईसह पुण्यात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी सेवेला फटका बसत आहे. प्रवासी या सेवेकडे पाठ फिरवू लागले असून फे ब्रुवारी महिन्यात प्रतिदिन असणारी २,८०० पर्यंतची प्रवासी संख्या सध्या २,४०० पर्यंत घसरली आहे. तर उत्पन्नही कमी होऊ लागले आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान कामानिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. या मार्गावर एसटी महामंडळाच्या धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांना तर शुक्रवार ते रविवार चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र करोनामुळे मार्च २०२० पासून एसटीच्या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली. टाळेबंदीमुळे तर एसटी सेवाही ठप्प राहिली होती. परिणामी एसटीचे उत्पन्न बुडाले. यात शिवनेरीलाही फटका बसला होता. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू एसटीची सेवा पूर्ववत झाली होती. त्यात मुंबई व पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होताच या दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे प्रवासीही मिळू लागले. परंतु मार्च २०२१ पासून पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढताच प्रवासी कमी होऊ लागले आहेत. वाढती रुग्णसंख्या व प्रवासी कमी असतानाही त्या दृष्टीने एसटी नियोजन करताना मात्र दिसत नाही. त्यामुळे खर्चही वाढत आहे. तीन महिन्यांत. जानेवारी २०२१ मध्ये ७६ शिवनेरी मुंबई ते पुणे मार्गावर धावत होत्या. प्रत्येक दिवशी एकू ण २ हजार ७३० प्रवासी प्रवास करत. त्यामुळे १३ लाख ३४ हजार रुपये उत्पन्न एसटीला मिळत होते. फेब्रुवारीत ७८ शिवनेरीतून दिवसाला २ हजार ८७० प्रवासी मिळू लागले. परंतु मार्च महिन्यात हीच संख्या कमी झाली. पुन्हा ७६ शिवनेरींमागे प्रत्येक दिवशी २,४०० प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवासी कमी झाल्याने एसटीच्या तिजोरीत उत्पन्नही ११ लाख ६८ हजारापर्यंत आले आहे. गेल्या वर्षी. फे ब्रुवारी २०२० मध्ये एकू ण ११० शिवनेरींमागे सात हजार प्रवासी दर दिवशी प्रवास करत होते. त्यामुळे ३२ लाख रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळत होते. तेच उत्पन्न कमी झाले आहे. नवी भीती. पुण्यात पुन्हा टाळेबंदीची स्थिती निर्माण झाली आहे. तसे झाल्यास शिवनेरीची संख्या आणखी कमी होईल. प्रवाशांची घट आणखी झाल्यामुळे नुकसानाचे प्रमाणही अधिक असेल.