कृती गटाचा इशारा; १० टक्के मुलांना बाधा होण्याची भीती मुंबई: गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता राज्याला लवकरच तिसऱ्या लाटेलाही सामोरे जावे लागू शकते, असा इशारा बुधवारी करोना नियंत्रणासाठीच्या तज्ज्ञांच्या कृती गटाने दिला. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दुपटीने वाढेल आणि त्यात १० टक्के मुलांना लागण होईल, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त के ली आहे. त्याची गंभीर दखल घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची सर्वत्र उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागास दिल्या. राज्यातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा के ली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभर सिरो सर्वेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे यावर भर देतानाच निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे सांगितले. इंग्लडसहअन्य इतर काही देशांत पुन्हा विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने निर्बंध लावण्याची वेळ आली आहे याकडेही कृती गटाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ’ राज्यात पहिल्या लाटेत गेल्या १७ सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे ३ लाख १ हजार ७५२ रुग्ण उपचाराधीन होते. ’ दुसऱ्या लाटेत २२ एप्रिलला ६ लाख ९९ हजार ८५८ उपचाराधीन होते. १३ सप्टेंबर रोजी सर्वाधिक ५१७ मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत २६ एप्रिल रोजी सर्वाधिक १११० मृत्यू झाले.