दिवसभरात ५५४२ नवीन बाधित; ६४ मृत्यू मुंबई : मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून रविवारी ५५४२ रुग्णांची नोंद झाली. तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही घटू लागले असून ते १३.७५ टक्के झाले आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत असून ८६ टक्के रुग्णा करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रविवारी ५ हजार ५४२ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६ लाख २७ हजार झाली आहे. एका दिवसात नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ८ हजार ४७८ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ५ लाख ३७ हजाराहून अधिक म्हणजेच ८६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती; मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दर ७९ टक्यांपर्यंत कमी झाला होता. आता हा दर वाढून ८६ टक्के झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती आता ७५ हजार ७४० झाली आहे. त्यापैकी ७७ टक्के म्हणजेच ६२ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर २२ टक्के म्हणजेच १७ हजार रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ४२१ झाली आहे. रविवारी ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात ३६ पुरुष व २८ महिलांचा समावेश आहे. ४२ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते. तर ३६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १७ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. ५ मृतांचे वय ४० वर्षांखालील होते. मृतांची एकूण संख्या १२ हजार ७८३ झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर फे ब्रुवारीनंतर रोज वाढू लागला होता. आता तो आता कमी होऊ लागला आहे. सध्या हा दर १.१७ टक्के आहे. तो दोन टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ५८ दिवसांवर पोहोचला आहे. दररोज ५० हजार चाचण्या करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. दर दिवशी ४५ ते ५० हजार चाचण्या के ल्या जातात. शनिवारी ४० हजार २९८ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सुमारे १४ टक्के नागरिक बाधित आढळले. आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.