– संदीप आचार्य

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात करोनाबाधित व संशयित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ३० ते ४० टक्के रुग्ण हे मुंबई बाहेरून आले असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. आकडेवारीचा विचार करता मुंबई हा करोनाचा केंद्रबिंदू झाल्याने उद्या मुंबईतील रुग्ण आणखी वेगाने वाढल्यास मुंबईतील रुग्णांची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न पडल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात पाच महापालिका असताना तेथे करोना रुग्णांची चाचणी, पुरेशा विलगीकरण खाटा तसेच उपचाराची व्यवस्था आजपर्यंत का करण्यात आली नाही असा सवाल केवळ पालिकेतील डॉक्टरच नव्हे तर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनही उपस्थित केला जात आहे. भिवंडी, कल्याण-डोंबिवली, ठाणे, वसई विरार, नालासोपारा येथून करोना संशयित रुग्ण थेट मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जात आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मिळून सुमारे ४१० रुग्ण आज दाखल आहेत. यातील ३० ते ४० टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरचे असल्याचे एका अधिष्ठात्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. मुंबई हा करोनाबाधितांचा केंद्रबिंदू बनला असून आता रोज किमान ५० ते ७० संशयित रुग्ण आढळून येत आहेत. याबाबत अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांना  विचारले असता, मुंबईबाहेरील रुग्ण बरेच असल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले, सुरुवातीला कस्तुरबा रुग्णालयात करोना चाचणीची व्यवस्था असल्याने मुंबईबाहेरील रुग्ण येथे येत होते.  जोपर्यंत अन्यत्र पुरेशी चाचणी व उपचाराची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत अजूनही काही प्रमाणात मुंबईत रुग्ण उपचारासाठी येतील. मुळात पालिका रुग्णालयांवर असलेला विश्वास व सा़थरोगावरील उपचाराची कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता लक्षात घेऊन येथे रुग्ण येणार हे उघड आहे. तसेच आलेल्या कोणत्याही रुग्णावर आम्ही उपचार करणार. मुंबई हा करोनाचा केंद्रबिंदू बनत आहे. आता धारावीतही करोनाचा रुग्ण सापडला आहे. एकूणच मुंबईतील रुग्णांचा आकडाही वेगाने वाढत आहे हे लक्षात घेऊन आम्ही पालिकेच्या विविध रुग्णालयात विलगीकरण खाटांची संख्या २१०० केली आहे. व्हेंटिलेटर पासून करोना चाचणीची क्षमता वाढविण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. तसेच राज्यभरात आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून करोनाबाधित रुग्णांवरील चाचणी व उपचाराची व्यवस्था वाढविण्याचे काम सुरूच असल्याचे काकाणी म्हणाले.

मुंबईला लागून असलेल्या ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा रुग्णालयात विलगीकरण खाटांची पुरेशी व्यवस्था नाही तसेच येथे करोना चाचणीची कोणती व्यवस्था आहे, असा सवाल मुंबई महापालिकेतील समाजवादी पक्षाचे नेते व भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी उपस्थित केला. आरोग्य विभागाच्या भिवंडीमधील इंदिरा गांधी रुग्णालयात व्हेंटिलेटर व विलगीकरणाची व्यवस्था असलेल्या सहा खाटा आहेत. भिवंडीच्या १२ लाख लोकसंख्येला त्या पुरेशा आहेत का, असा सवालही रईस शेख यांनी केला. कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, नालासोपारा तसेच ठाणे महापालिका हद्दीत करोना रुग्णांच्या चाचणीसाठी किती केंद्र आहेत? किती डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले? व किती विलगीकरण खाटा आहेत? ते संबंधितांनी जाहीर करावे असे आवाहन रईस शेख यांनी केले. या सर्वाचा ताण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांनी का सहन करावा असा सवाल करत मुंबईतील वाढते रुग्ण पाहाता अन्य महापालिकांनाही सक्षम करावे लागेल असे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिका हा करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. रोजच्या रोज रुग्ण वाढत आहेत. अनेक विभाग बंद करावे लागत आहेत याचा विचार करता मुंबई लगतच्या महापालिका करोनाचा लढा लढण्यासाठी आधीच सक्षम करायला हव्या होत्या असे भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबईतील रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, उद्या मुंबईतील रुग्णांना उपचार मिळण्यात अडचण आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही शेलार यांनी केला.

मुंबईतील गिरण्यामधील मोकळ्या जागा, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मोकळ्या जागा, परळचे कामगार विमा रुग्णालय आदी जागांमध्ये विलगीकरणासाठी व्यवस्था करता येऊ शकते व तशी सुचनाही आपण मुख्य सचिवांना केल्याचे शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात एरवीही उपचार घेणारे ४० टक्यांपेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईबाहेरचेच असतात. तथापि करोनासारख्या साथीच्या आजाराशी सामना करण्यासाठी मुंबईलगतच्या अन्य महापालिकांनीही तातडीने सक्षम होणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.