राजधानी दिल्लीला तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. जे कुणी असं करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

तबलिगी मकरजला गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. एकट्या मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या जवळ गेला आहे. दिवसांगणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाचर करत आहे. मरकज येथे गेलेल्या नागरिकांमुळे इतरांना करोना व्हायरस होऊ नये या उद्देशानं बीएमसीनं ट्विट करत माहिती देण्याचं आवाहन केले आहे. जर प्रवासाची माहिती दिली नाही तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पालिकेनं स्पष्ट केले आहे. करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी रूग्णांची अथवा रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवून त्यांना विलगीकरण कक्षात अथवा आयसोलेशनमध्ये ठेवणं हा एकमेव उपाय आहे.

आणखी वाचा- तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतांसह जवळजवळ १६ देशातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला जवळजवळ २३०० लोकांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. करोना व्हायरसमुळे दिल्ली सरकारने धार्मिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमावर बंदी घातली होती. मात्र दिल्लीत तबलिगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच तबलिगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात साथीच्या रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.