राज्यात एकीकडे १५ करोनाबाधित रुग्णांना उपचार करुन घरी सोडल्याची दिलासादायक बातमी आल्यानंतर आता अजून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आज दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आम्ही तपास आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

याआधी वाशीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्यात करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यात करोनाचे १२५ रुग्ण आहेत. नागपूरमध्ये करोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. महाराष्ट्रात कालच दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे दाम्पत्य करोनाची लागण झालेलं पहिलं दाम्पत्य होतं. त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली.

करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत कुणीही गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवा या सगळ्या संचारबंदी आणि लॉकडाउनमधून वगळण्यात आल्या आहेत.