मुंबई : केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई), राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ (एनआयओएस) सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून जेईई मुख्य परीक्षांच्याही तारखा बदलण्याचाही विचार सुरू आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय स्तरावरून विविध पावले उचलण्यात येत आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिल्यानंतरही परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, परीक्षांच्या दरम्यान केंद्रांबाहेर होणारी गर्दी, विद्यार्थी आणि पालकांमधील ताण लक्षात घेऊन आता ३१ मार्चपर्यंत सीबीएसई आणि एनआयओएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या दहावीच्या बहुतेक महत्वाच्या विषयांची परीक्षा झाली आहे. बारावीच्या वेळापत्रकावर मात्र या निर्णयाचा परिणाम होणार आहे. बारावीच्या वाणिज्य शाखेच्या २ आणि कला शाखेच्या तीन विषयांची परीक्षा आता एप्रिलमध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या मूल्यांकनाचे कामही ३१ मार्चपर्यंत थांबवण्यात येणार आहे. जेईई मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचाही विचार करण्यात येत आहे. आताच्या वेळापत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा ५ ते ११ एप्रिल दरम्यान होणार आहे. मात्र, सीबीएसई, विद्यापीठे आणि एनआयओएसच्या परीक्षा आणि जेईईच्या परीक्षा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेईईच्या परीक्षांचे वेळापत्रकही बदलावे लागू शकते असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे. ३१ मार्चनंतर परीक्षांबाबत पुढील आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.