गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १९६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. गेल्या दहा दिवसांत हा कालावधी १०० दिवसांनी कमी झाला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत १ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली, तर १७ जणांचा मृत्यू झाला.

मुंबईतील एकूण बधितांची संख्या २ लाख ८१ हजारांच्या पुढे गेली आहे. शनिवारी ८८० रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत २ लाख ५५ हजाराहून अधिक म्हणजेच ९१ टक्के रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सध्या १२,७५३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शनिवारी १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या १०,७७३ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.३५ टक्के झाल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. दिवाळीपूर्वी ३२० दिवसांवर असलेला कालावधी आता १९६ दिवसापर्यंत खाली आला आहे. दहा दिवसांपूर्वी हा कालावधी २९७ दिवसांपर्यंत होता.

ठाणे जिल्ह्य़ात ७५८ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ७५८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख २७ हजार ७९९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील करोनाबळींची संख्या ५ हजार ६६९ इतकी झाली आहे.
शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील २०३, ठाणे शहर १९६, नवी मुंबई १४३, मीरा-भाईंदर ७३, ठाणे ग्रामीण ४६, बदलापूर ४१, उल्हासनगर २६, अंबरनाथ १७ आणि भिवंडीतील १३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये नवी मुंबईतील चार, ठाणे शहर तीन आणि कल्याण-डोंबिवलीतील दोन रुग्णांचा समावेश आहे.

देशात २४ तासांत ४१ हजार करोनाबाधित

देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ३२२ करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९३ लाखांहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत ८७ लाख ५९ हजार ९६९ जण करोनामुक्त झाल्याने बरे होण्याचे प्रमाण ९३.६८ टक्के इतके झाले आहे. शनिवारी ४८५ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या एक लाख ३६ हजार २०० इतकी झाली आहे. करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४६ टक्के इतके आहे.

राज्यात ५,९६५ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ५,९६५ रुग्णांचे निदान झाले असून, ७५ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ८९,९०५ झाली असून, सर्वाधिक १९,८९९ रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ात आहेत. दिवसभरात पुणे शहर ५२५, पिंपरी-चिंचवड २०३, उर्वरित पुणे जिल्हा ३४०, सातारा २२८, नागपूर शहर ३५५ रुग्ण आढळले.