जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसाचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाकडून करोनाला संपवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र या कालावधीत अत्यासवश्यक सेवा सुरू आहेत. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता प्रोत्साहन भत्त्याची घोषणा करण्यात आली आहे. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या भयानक काळात देशपातळीसह राज्यपातळीवर अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिक, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

परब म्हणाले, देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. मुंबईसारख्या महानगरात अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरवण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर सोपवली आहे. ही जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. रोज एसटीचे सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करत आहेत. केवळ मुंबईतीलच नाही तर ठाणे, पालघर, रायगड  अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत घर नाही, त्यांची राहण्याची, भोनाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कामावर जाताना मास्क व सॅनिटरी लिक्विडची बाटली दिली जात आहे. एसटी प्रशासनामार्फत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात असल्याचेही परब म्हणाले.