सध्या देशावर करोनाचं संकट असून टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे अशी मागणी केली.

“नरेंद्र मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचं मोठं संकट असल्याने सध्या टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर करा”, संजय राऊत यांची नरेंद्र मोदींकडे मागणी

लाखो मजुरांनी मुंबईतून स्थलांतर केलं आहे. मुंबईत त्यांचं पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेले आहेत असं सांगताना संजय राऊत यांनी मुंबईसारख्या शहरांचं महत्त्व टिकवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. “देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व टिकवणं महत्त्वाचं आहे. मुंबईचं आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकलं पाहिजे. त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणं गरजेचं आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

लॉकडाउन चारसंबंधी सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावी अशी भूमिका मांडली होती असं संजय राऊत यांनी सांगितलं. एकनाथ खडसेंना ऑफर मिळाल्याचा दावा केला असल्याचं विचारलं असता शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून  मिळालेल्या ऑफरची माझ्याकडे काही माहिती नाही. मी त्यासंबंधी वक्तव्य करणं चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं.