बडय़ा चित्रपटांचे ‘आस्थे कदम’, जुन्या चित्रपटांच्या प्रदर्शनावरून वाद

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू करण्यात आलेली चित्रपटगृहे निम्म्या प्रेक्षकक्षमतेने का होईना रसिकांचे स्वागत करण्यास सज्ज असली तरी, प्रेक्षकांना दाखवायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नवीन चित्रपट प्रदर्शनाबाबतचा सावध पवित्रा, जुन्या चित्रपटांच्या विमा संरक्षणाचा मुद्दा आणि अन्य कारणांमुळे तिकीटबारीवर नवीन चित्रपटच आलेले नाहीत.

आठ महिन्यांच्या टाळेबंदीनंतर हिंदीत ‘झी स्टुडिओज’चा ‘सूरज पे मंगल भारी’ हा नवाकोरा हिंदी चित्रपट देशभरात निवडक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झाला आहे. मात्र वितरकांनी सगळ्याच चित्रपटगृहांना चित्रपट दिलेला नसल्याने काही ठरावीक एकल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकला आहे. शिवाय, हा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित करण्यात येत असल्याबद्दल कोणतीही जाहिरात करण्यात आली नव्हती किं वा तो कोणकोणत्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे, याची माहितीही लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रेक्षक चित्रपटगृहात फिरकलेच नाहीत, अशी माहिती ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली. अनेक एकपडदा चित्रपटगृहांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने जोवर नवीन चित्रपट प्रदर्शनात सातत्य येत नाही तोवर अनेकांनी चित्रपटगृहे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट के ले.

‘सूरज पे मंगल भारी’ला प्रेक्षकांचा प्रतिसादच नाही आहे, तर ‘मलंग’ आणि ‘बागी ३’ हे जुनेच चित्रपट लावले होते, मात्र या चित्रपटांनी विम्यासाठी दावा के ला असल्याने विमा कं पन्यांनी आता हे चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित करण्यास आक्षेप घेतला असल्याची माहिती ‘जी ७’ मल्टिप्लेक्स आणि ‘मराठा मंदिर सिनेमा’चे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी दिली. प्रेक्षकोंअभावी ‘सूरज पे मंगल भारी’चे रात्रीचे खेळही रद्द करावे लागले आहेत. ‘मराठा मंदिर सिनेमा’मध्ये मॅटिनीला नेहमीप्रमाणे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ दाखवतो आहोत; पण त्याशिवाय इतर चित्रपटगृहांमध्ये दाखवायचे काय, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. एकीकडे चित्रपट नसल्याने उत्पन्न नाही आणि चित्रपटगृहे सुरू के ली असल्याने वीज बिल, पाणी बिल, मालमत्ता करासह वाढीव कर्मचारी आणि त्यांचे पगार अशा वाढत्या खर्चामुळे डोके च सुन्न झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त के ली. दिवाळीचा आठवडा नुकसानीचा गेला, २० नोव्हेंबरलाही नवीन चित्रपट हातात नसल्याने अडचणी  वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ते हृतिक-टायगर जोडीचा ‘वॉर’ चित्रपट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अक्षय कु मारचा ‘लक्ष्मी’ किमान एकपडदा चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा, यासाठी चित्रपटगृह मालक प्रयत्नशील होते, मात्र हा चित्रपट अक्षयने आधीच ओटीटीला विकला असल्याने आता हा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित करण्याचा अधिकार नसल्याने हे प्रयत्न व्यर्थ ठरले असल्याचे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी स्पष्ट केले.

या चित्रपटांवर भिस्त

यशराज प्रॉडक्शनचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट नाताळच्या आठवडय़ात प्रदर्शित होऊ शके ल, अशी चर्चा आहे. मात्र यशराजने या संदर्भात कोणताही निर्णय जाहीर के लेला नाही. ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘टेनेट’ हा हॉलीवूडपट २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत डब होऊन प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे थोडाफार दिलासा मिळू शके ल, अशी आशा आहे.

‘८३’चे प्रदर्शनही लांबणीवर

मुंबई : दिवाळीचा आठवडा सुना गेल्यानंतर डिसेंबर आणि नाताळकडे डोळे लावून बसलेल्या चित्रपटगृह व्यावसायिकांना आणखी एक धक्का बसला आहे. या वर्षी ‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ हे दोन बहुचर्चित, बहुकलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होणार होते. त्यापैकी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट पुढे ढकलला असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. आता कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा सिनेमाही या वर्षी प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीत प्रदर्शित होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ‘रिलायन्स एन्टरटेन्मेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशीष सरकार यांनी सांगितले आहे. के वळ देशातच नाही तर करोनाची दुसरी लाट आल्यामुळे परदेशातही अनेक ठिकाणी चित्रपटगृहे बंद झाली असल्याने ही बाजारपेठ खुली होईपर्यंत मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.