मुंबई : मुंबईत शुक्रवारी करोनाच्या १ हजार ३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४८ तासांत ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या ४ हजार ७५९ झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८ टक्के इतका कायम आहे. शुक्रवारी १ हजार ३७२ रुग्ण वाढल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८१,६३४ वर गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला १ हजार ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे ५२ हजार ३९२ म्हणजेच ६४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २४ हजार ४८३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर १ हजार १३९ संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल केले आहे. गेल्या ४८ तासांत ७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ५८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.७१ टक्के असला तरी मुलुंडमध्ये तो सर्वात जास्त म्हणजे ३.९ टक्के आहे. त्याखालोखाल बोरिवली, भांडूप, कांदिवली, दहिसर, मालाड, नानाचौक, वांद्रे पश्चिम येथे रुग्णवाढ वेगाने होत आहे. ठाणे जिल्ह्यात २४ तासांत २ हजार २७ रुग्ण ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये २ हजार २७ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता ३८ हजार ५९४ इतका झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची एकूण संख्या १ हजार १७६ झाली आहे. शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत ५६४, ठाणे शहरात ४२०, मीरा-भाईंदर शहरात २७६, नवी मुंबईत २५७, उल्हासनगर शहरात १९१, ठाणे ग्रामीणमध्ये १०८, अंबरनाथ शहरात १०१, भिवंडीत ६२ आणि बदलापूरमध्ये ४८ रुग्ण आढळले. राज्यातील रुग्णसंख्या राज्यात २४ तासांत ६,३६४ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर ४८ तासांत १९८ जण मृत्यूमुखी पडले. राज्यात आतापर्यंत करोनाने ८,३७६ जण मरण पावले आहेत. देशात दिवसभरात २०,९०३ रुग्ण नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच करोनाच्या रुग्णांमध्ये २० हजारांहून अधिक वाढ झाली तर, तितकेच रुग्ण बरे झाले. देशात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या २० हजार ९०३ रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या ६ लाख ५२ हजार ५४४ झाली. त्याचवेळी २० हजार ३२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ७९ हजार ८९२झाली आहे. दिवसभरात ३०७ मृत्यूंची भर पडल्याने एकूण मृत्यू १८ हजार २१३ झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले असून २ लाख २७ हजार ४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे.