करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात नसल्याने मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसल्यास मुंबई पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. मुंबई पोलिसांची ही ऑर्डर नित्यक्रमाचा भाग असून अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आधीच्या आदेशात सूट देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत.

पोलीस उपायुक्तांकडून त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही ऑर्डर दर १५ दिवसांनी होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग असून नवीन लॉकडाउन असल्याचा गैरसमज केला जाऊ नये असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

 

दरम्यान मुंबईत बुधवारी २३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. दररोज दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या ३१ हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग सध्या १.२८ वर गेला आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण ७७ टक्के आहे.