मुंबईतील जोगेश्वरी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये बुधवारी करोनामुळे मृत्यू झालेल्या एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास कब्रस्तानच्या विश्वस्तांनी विरोध केला. त्यामुळे अखेर त्याचे दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यानुसार, मृत करोनारुग्णाच्या नातेवाइकाने आरोप केला की, “करोनामुळे मृत्यू झालेल्या आमच्या नातेवाईकाचा मृतदेह घेऊन आम्ही कब्रस्तानमध्ये गेलो. पण तेथील विश्वास्तांनी आम्हाला मृतदेह दफन करू दिला नाही. कार तो करोनाचा रुग्ण होता. सरकारी अधिकाऱ्यानी पहाटे चार वाजता दफन करण्यास परवानगी दिलेली असताना आम्हाला कब्रस्तानच्या विश्वस्तांनी विरोध केला.”

त्यानंतर निर्माण झालेल्या वादात अखेर पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दफन करू देण्याची विनंती विश्वस्तांकडे केली. पण, तरीही विश्वस्तांनी ऐकलं नाही, असा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे.

त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन हिंदू स्मशानभूमीमध्ये त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यामुळे अखेर त्या रूग्णावर दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत मालवणीचे आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले की, “सरकारच्या नियमावलीनुसार करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर दहन करून अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. तेही ज्या हॉस्पिटलमध्ये त्या रूग्णाचा मृत्यू झाला तेथून जवळच अंत्यसंस्कार करावे, असे स्पष्ट आहे.”

संबंधित प्रकरणात मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट रुग्णालयातून आपल्या शहरात कब्रस्तानमध्ये नेला. याची कल्पनाही त्यानी तेथील विश्वस्तांना दिली नाही आणि थेट त्यांनी मृतदेह दफन करण्याची परवानगी मागितली. आता मृतदेह कब्रस्तानमध्ये नेऊ देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

या सर्व प्रकरणाबद्दल मृत रुग्णाच्या मुलाने सांगितले की, “माझ्या वडिलांचा मृत्यू झाला हे हॉस्पिटलने जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे कोणीच आले नाही. मी मृतदेह घेऊन हॉस्पिटलबाहेर तीन तासांहून अधिक काळ बसून होतो.”