मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामातील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असून या आरोपात तथ्य असल्याचेही सावंत यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे. केवळ पुरंदर तालुक्यातच नव्हे तर आणखी १३०० प्रकरणांत अनियमितता झाल्याच्या तक्रारी असून त्याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनीच सांगितल्यामुळे सत्ताधारी पक्षाची कोंडी झाली. अखेर सभापती रामराजे निंबाळकर यांनी हा प्रश्न राखून ठेवला.

‘जलयुक्त शिवार’ योजनेतील भ्रष्टाचार आणि संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईसंदर्भात आमदार विद्या चव्हाण, किरण पावसकर, अनिकेत तटकरे आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर, भ्रष्ट अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी होणार का, असा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता.

राज्यात २२ हजार ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामे झाल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले, तरी २८ हजार गावांमध्ये दुष्काळ असल्याचे सांगत या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. या भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून खुली चौकशी सरकार करणार का, असा प्रश्न परत परत मुंडे यांनी केला, तेव्हा हा तांत्रिक विषय असून सध्या विभागाकडे या १३०० गैरव्यवहार प्रकरणांबाबत चार प्रमुख विभागांचे अहवाल आले असून उर्वरित दोन अहवाल आल्यानंतर त्याचा अभ्यास करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उत्तर मंत्र्यांनी दिले.

‘जलयुक्त शिवार’ योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या योजनेचे सातत्याने समर्थन करत होते. आता मंत्र्यांनीच या योजनेतील भ्रष्टाचाराची कबुली दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून सरकारपुढील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

पुरंदर तालुक्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून समोर येत आहे. आणखी १३०० प्रकरणांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यामुळे जिल्ह्य़ाबाहेरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे.

– तानाजी सावंत, जलसंधारणमंत्री