मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. पूल दुर्घटनाप्रकरणी संबधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहेत तर निवृत्त अभियंत्यांची चौकशी होणार आहे. तर मुंबईतील २९६ पुलांचं पुन्हा ऑडीट करण्यात येणार आहे. तसेच, स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी , ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर.बी.तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचं निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.या याचिकेवर २२ मार्च रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरु होती. पण अखेर महापालिकेने हा पूल आमचाच असल्याचं मान्य केलं. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हा पूल पूर्णपणे पालिकेचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूल दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संबंधीत कारवाई करण्यात आली आहे.

 युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेच काही क्षणांमध्ये बीएमसीमधील आधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिला होता. त्यानुसार, याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार जणांना निलंबित करण्यात आले आहे तर देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे.