अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळ संथपणे गुजरातच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, आज (१७ मे) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. एनडीआरएफसह प्रशासन चक्रीवादळाच्या आपत्तीला तोंड देत असतानाच मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजं भरकटल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून, यापैकी एका जहाजावर २७३, तर दुसऱ्यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौते चक्रीवादळामुळे भरकटली आहे. या बोटीवर २७३ जण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याचे समजते. वादळामुळे ही बोट भरकटलीय. बोटीने नांगर टाकलेल्या नसल्याने ती वादळामुळे आलेल्या वाऱ्यासोबत वाहत गेली. ही बोट बंदरामधील तसेच समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> Explained : दरवर्षी महाराष्ट्राला वादळाचा तडाखा बसणार का?; अरबी समुद्रात नक्की काय घडतंय?

भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने या बोटीवरील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. त्याचप्रमाणे मुंबईच्या किनारपट्टीपासून ७० किमीवर असणाऱ्या बॉम्बे हाय या तेल उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पालाही ही बोट धडकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने या बोटीला शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या बोटीचं सांकेतिक क्रमांक ‘पी ३०५’ असा असून बोटीकडून मदत मागण्यात आल्यानंतर आयएनएस कोच्चीला या बोटीवरील व्यक्तींची सुटका करण्यासाठी पावण्यात आलं आहे. आयएनएस कोच्चीने सर्च अॅण्ड रेस्क्यू ऑप्रेशन हाती घेतल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलीय.

आयएनएस कोच्ची दुपारी चारपर्यंत या बोटीजवळ पोहचणं अपेक्षित होतं असंही प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

तसेच दुसरीकडे मुंबईच्या समुद्रामध्येच ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आणखीन एक मोठं जहाज भरकटलं असून त्यावर १३७ जण आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतासाठी पाठवली आहे.

गुजरातला बसणार फटका…

मंगळवारी पहाटे तौक्ते वादळ गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि माहुवा किनाऱ्यांना धडकण्याआधी अती तीव्र स्वरुपाचे म्हणजेच व्हीएससीएस प्रकारचे वादळ असेल. हे वादळ जेव्हा गुजराच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा त्याचा वेग १५० ते १६० किमी प्रती तास इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वादळामुळे गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, पोरबंदर, जुनागढ, भावनगर, अहमदाबाद, सुरत, वलसाड, अमरेली, आनंद आणि भरुच या १२ जिल्ह्यांबरोबरच दिवमध्येही मोठ्याप्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबईमध्ये वादळी वारे वाहत असल्याने छपत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ११ ते २ या कालावधीमध्ये सर्व विमान उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone tauktae barge with 273 on board adrift near mumbai scsg
First published on: 17-05-2021 at 16:22 IST