दलाई लामा यांचे प्रतिपादन भारत आणि चीन यांनी मानवी विकासासाठी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन धर्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी केले. डोकलामच्या मुद्यावरून भारत-चीनमध्ये सध्या सुरूअसलेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर विश्व शांती आणि एकता परिषदेत ते बोलत होते. धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसा आणि आतंकवादामुळे आपल्याला अतीव दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले. वरळीत रविवारी ‘अहिंसा विश्व भारती’ या आध्यात्मिक संस्थेतर्फे विश्व शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दलाई लामा यांनी ‘विश्व शांती आणि ऐक्य’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी मंचावर योगगुरू बाबा रामदेव, अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक, ख्रिस्ती संघटनेचे आर्च बिशप फेलिक्स मव्हादो, अकाल तख्त प्रमुख जत्थेदार ज्ञानी गुरबचन सिंह, अहिंसा विश्व भारतीचे डॉ. लोकेश मुनी आणि जैनाचार्य कुलचंद्र महाराज उपस्थित होते. चीनला योगाची भाषा समजत नसेल तर युद्धाच्या भाषेतून उत्तर द्यावे लागेल, असे मत बाबा रामदेव म्हणाले. ‘मुस्लिमांनी बाबरीची जागा हिंदूंना द्यावी’ सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागल्यास मुस्लिमांनी या निर्णयाला विरोध न करता त्याचे स्वागत करावे. मुस्लिमांच्या बाजूने निकाल लागल्यास त्यांनी बाबरी मशिदीची जागा आनंदाने हिंदूंच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांनी या वेळी केले.