‘आगीत आमचे सर्व काही भस्मसात झाले आहे. त्यातून आम्ही अद्याप सावरलेलोही नाही. अशा वेळी राज्य शासन अवघ्या ३ हजार ८०० रुपयांची मदत करुन आमची चेष्टा करताय का? असा जळजळीत सवाल दामूनगर मधील रहिवाशांनी बुधवारी पोलिसांना केला आणि पोलीसही निरुत्तर झाले. राज्य शासनाकडून दामूनगर मधील रहिवाशांना मदत म्हणून प्रत्येकी ३ हजार ८०० रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. रहिवाशांना ते धनादेश सुपूर्द करण्यासाठी पोलीस दामुनगरात गेले होते. तातडीने प्रत्येकी किमान १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जावी, अशी अपेक्षा रहिवाशांची आहे.