सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप मुंबई : मागील सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या खासगी शिवशाही बस सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून बसगाडय़ांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अटींचा भंग केला आहे. त्यामुळे शिवशाहीची सफर असुरक्षित ठरू शकते, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सेवा सुरू करण्यासाठी खासगी कंत्राटदारांसोबत करार केला; परंतु बसगाडय़ांचा पुरवठा करणाऱ्या संस्थांनी बस मानांकनाचे सर्व निकष धाब्यावर बसविले असून महामंडळाला उपलब्ध केलेल्या बसगाडय़ांमधील सुरक्षिततेच्या अभावामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकारच्या मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असलेल्या संस्थेकडून गाडीची बांधणी करणे, अग्निसुरक्षाविषयक एफडीएसएस प्रणालीचा अभाव, कामगारांना हक्कांपासून वंचित ठेवणे, आवश्यक ती चाचणी (एडीटीटी) न करताच चालकाची नियुक्ती करणे अशा विविध अटी आणि शर्तीचा भंग संबंधित कंपनीकडून करण्यात आल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते शशांक बोरेले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. गेल्या वर्षभरात शिवशाहीच्या १५ बसगाडय़ांमध्ये आगीच्या घटना घडल्या. त्याची महामंडळाने गांभीर्याने दखल घेतलेली नाही. उलटपक्षी कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराकडे डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप बोरेले यांनी केला.