‘इन्फोटेन्मेट’ या संकल्पनेला अनुसरून ‘डिस्कव्हरी’ वाहिनी सुरू झाली तेव्हा ती फक्त विज्ञान विषयापुरती मर्यादित होती. सध्या डिस्कव्हरी, डिस्कव्हरी किड्स, डिस्कव्हरी टबरे, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी अशा या समूहाच्या तब्बल ११ वाहिन्या दाखवल्या जातात. ‘डिस्कव्हरी’ वाहिनीचा आशय आणि प्रेक्षक या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याने अन्य जीईसींच्या (जनरल एंटरटेन्मेंट चॅनेल्स) शर्यतीत धावण्याची त्यांना गरज नाही. मात्र, बदलत्या काळाबरोबर जास्तीत जास्त प्रेक्षकांना आपल्याशी जोडून घ्यायचे असेल तर वाहिनीला देशी चेहरा देणे गरजेचे वाटत असून, त्यादृष्टीने ‘डिस्कव्हरी’च्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर देशी आशय असलेल्या मालिका सुरू करण्यात येणार आहेत. हृतिक रोशन, ए. आर. रेहमानसारखे हिंदीतील मोठे चेहरे येत्या काळात वाहिनीशी जोडले जाणार आहेत. ‘डिस्कव्हरी’ वाहिनी सध्या ३५ ते ४० दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. यात मूळ ‘डिस्कव्हरी’ वाहिनी, ज्याचा गाभा हा विज्ञान आहे त्यासह लहान मुलांसाठी स्वतंत्र वाहिनी आहे, पर्यटन आणि जीवनशैली यांना जोडणारी वाहिनी आहे, ‘डिस्कव्हरी टबरे’ ही गाडय़ांच्या अत्याधुनिक तंत्रविश्वाशी जोडलेली आहे. एकूणच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत ज्यांना जे पाहायला आवडेल ते देणाऱ्या सर्व वाहिन्या आमच्या ताफ्यात आहेत. त्यादृष्टीने आम्ही परिपूर्ण आहोत, अशी आपली भावना असल्याचे ‘डिस्कव्हरी’चे दक्षिण आशियाई विभागाचे विपणन प्रमुख राजीव बक्षी यांनी सांगितले. तरीही ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर आजवर प्रसारित होणारे कार्यक्रम हे प्रामुख्याने देशविदेशातून आलेले आहेत. हे कार्यक्रम इथल्या लोकांना आवडतात. पण, सध्या मुलांबरोबरच पूर्ण कुटुंब वाहिनीशी जोडले जाते आणि त्यांना आपल्या देशात काय वेगळे घडते, हे जाणून घेण्यात जास्त रस असल्याचे लक्षात आल्यामुळे वाहिनीने देशी आशय निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न वाढवले असल्याची माहिती बक्षी यांनी दिली. ‘आयडी’ (इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी)वर ‘खुनी साया’ ही मालिका रोहित रॉयबरोबर सुरू केली होती. त्यात ‘शैतान’ ही गुन्हेतपासावर आधारित नवीन मालिका सुरू होते आहे. अभिनेता शरद केळकर त्याचे सूत्रसंचालन करणार आहे. ए. आर. रेहमानच्या संगीताची जादू जगभरातील लोकांवर आहे. पण, मुळात रेहमान घडला कसा?, त्याचे संगीत त्याने कसे विकसित केले, काय जादू आहे त्याच्या संगीतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती नाहीत. पण, ती माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे रेहमानवर एक खास मालिका तयार केली असल्याचे बक्षी यांनी सांगितले. याशिवाय, ह्रतिक रोशनसारखा बॉलीवूडचा स्टार कलाकार ‘डिस्कव्हरी’वर एका खास शोचे सूत्रसंचालन करणार आहे. मात्र, त्याविषयी प्रेक्षकांना नंतर कळेल, असे सांगत त्यांनी या शोची माहिती गुप्त ठेवली आहे. ज्या कथा कुणी पाहिल्या नाहीत, ऐकल्या नाहीत त्या लोकांसमोर आणणे ही वाहिनीची खासियत यापुढेही कायम राहील. मात्र, आत्तापर्यंत वाहिनीच्या माध्यमातून जग तुमच्यासमोर उलगडेल, असा आमचा उद्देश होता. यापुढे भारतातील अशा नवलकथा जगापुढे आणण्याचा वाहिनीचा मानस असल्याचे बक्षी यांनी स्पष्ट केले.