मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने चावा घेतलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.  श्रीनिवास येल्लप्पा (२४) असे त्यांचे नाव आहे.

कुर्ला कमानी येथील इंदिरानगरमधील रहिवाशी श्रीनिवास यांना मेंदूज्वर आणि यकृताचा आजार होता. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीनिवास यांच्या डोळ्याच्या आजबाजूला जखमा आढळून आल्याने मंगळवारी नातेवाईकांनी चौकशी केली असता, उंदराने चावा घेतल्याचे स्पष्ट झाले.

श्रीनिवास हे बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा उंदीर चावण्याच्या घटनेशी संबंध नाही, असे राजावाडीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.