भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा त्यांचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘अबकी बार २२० पार’ असा नारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  तर सध्या त्यांच्याकडे असलेल्या राज्याच्या महसूल मंत्री पदाबाबत  पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीची माळ गळ्यात पडल्यानंतर माध्यम प्रतिनिधीशी  बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, सर्व जबाबदाऱ्यांना मी न्याय देऊ शकेल हे गृहीत धरूनच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा देखील सर्व जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा कायम प्रयत्न राहील. क्षमतेपेक्षा अधिक काम मिळाल्यांनतर क्षमता अधिक वाढते. जर कमी काम घेतलं तर क्षमता कधीच वाढत नाही. त्यामुळेच संघटना देईल त्या जबाबदाऱ्या मी स्वीकारत असतो. ही जबाबदारी देखील महत्त्वाची आहे. मला याबात अगोदर काहीही कल्पना नव्हती मात्र आता एकदा जबाबदारी मिळाली असल्याने मी त्यानुसार योजना आखणार आहे. विधानसभा निवडणुक अगदी जवळ आली असल्याने मला खुप तयारी करावी लागणार आहे. आता केवळ पश्चिम महाराष्ट्र नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र माझ कार्यक्षेत्र असणार आहे. तर नवी जबाबदारी मिळाल्यानंतर  माझ्याकडे असलेल्या मंत्रीपदाबाबत  पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे सांगत, विधानसभेचा भाजपाचा आकडा ठरला असून तो म्हणजे अबकी बार २२० पार आहे. असेही त्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले.

पक्षाकडे लक्ष देण्यासाठी पुर्णवेळ अध्यक्ष गरजेचा – दानवे
तर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की, अमित शहा यांनी माझी ६ जानेवारी २०१५ मध्ये महारष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी माझ्यावर मंत्रीपदाची देखील जबाबदारी होती, मात्र एक पद एक व्यक्ती या न्यायाप्रमाणे मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढील पाच वर्षे मी पुर्णपणे पक्षासाठी काम केल. माझी टीम व माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे आज पक्ष प्रथम क्रमांकावर गेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मी पाचव्यांदा लोकसभेत गेलो आणि पंतप्रधान मोदींनी मला पुन्हा मंत्री मंडळात स्थान दिले. या अगोदर १८ जानेवारी २०१६ रोजी माझी पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केली गेली होती. यानंतर जवळापास पाच वर्षांचा मला कार्यकाळ मिळाला होता. भाजपात एक व्यक्ती एक पद अशाप्रकारची घटनेत तरतूद आहे. तसेच, घटनेत ही देखील तरदूत आहे की, एकाच व्यक्तीला सलग तीन वेळा अध्यक्षपद भूषवता येत नाही. दोनवेळाच त्याला अध्यक्षपद देता येऊ शकतं. त्यामुळे यंदा देखील मी मंत्री झाल्यामुळे आणि पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय राहावा यासाठी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अन्य कोणाला तरी द्यावी, अशी मी विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुकांच्या तोंडावर पक्षाकडे लक्ष देण्यासाठी पुर्णवेळ अध्यक्ष असणे देखील गरजेचे आहे असेही ते म्हणाले.