राज्यातील एसटीच्या २,६८२ चालक- वाहक भरती प्रक्रि या पुन्हा थांबली आहे. करोनाचा वाढता संसर्ग आणि टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा ही प्रक्रिया थांबल्याने हे चालक- वाहक सेवेत अद्यापही रुजू होऊ शकलेले नाही.

गेल्या वर्षी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गांतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने त्यावरील स्थगिती फे ब्रुवारी २०२१ मध्ये उठवली होती.

करोनाचा संसर्ग वाढल्याने आणि पुन्हा निर्बंध लागू झाल्याने चालक – वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा थांबली आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या व अंतिम चाचणी बाकी असलेले ४७२ चालक -वाहक आणि निवड पूर्ण होऊन प्रशिक्षण सुरू होणारे २ हजार २१० चालक – वाहक यात आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी भरती प्रक्रि या तात्पुरती थांबवण्यात आल्याचे सांगितले.

सर्वाधिक औरंगाबादमधील ११३, परभणीतील १७८, अमरावतीतील ८७, बुलढाण्यातील ४०१, धुळेतील २५४, जळगावमधील १७३, सोलापूरमधील ३४२, सांगलीतील १०५, कोल्हापूरमधील २०७, नागपूरमधील २३२, भंडारातील ५० चालक कम वाहक आहेत.

चालक -वाहक महिला

आता चालक -वाहक म्हणून २१५ महिला कर्मचारीही रुजू होणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण फे ब्रुवारी २०२१ पासून सुरू झाले आहे. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर त्यांची मुख्य वाहन चाचणी होईल.