राज्यात युरिया खताला असलेली मागणी पाहता पाच लाख मेट्रिक टन अतिरिक्त युरिया देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाच वेळी खतांची मागणी वाढली. त्याचबरोबर या वर्षी द्रवरूप खतांचा वापरही कमी होत आहे परिणामी युरियाचा वापर वाढला आहे. राज्यातील खतांची परिस्थिती पाहून नुकतीच केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन युरिया देण्याची मागणी करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले.

राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १७ लाख मेट्रिक युरियाची मागणी केली होती. मात्र त्यात २ लाख मेट्रिक टन कपात करून राज्याला १५ लाख मेट्रिक टन युरिया पुरवठा झाला आहे. मात्र हा कपात केलेला २ लाख मेट्रिक टन युरियादेखील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आली आहे.

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून विक्री केलेल्या युरियाचे ट्रॅकिंग केले जात असून एखाद्या शेतकऱ्याला ज्या प्रमाणात युरिया विक्री  झाली त्याचे तेवढे क्षेत्र आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे. ज्या दुकानांचे साठेबाजीमुळे परवाने रद्द करण्यात आले आहेत त्यांना पुन्हा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.