केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक कायद्यांना काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. हे कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस नेत्यांनी सोमवारी राज्यपालांना दिले. केंद्रातील भाजपचे सरकार हे जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे नसून फक्त सूट बूटवाल्यांचे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.

काँग्रेसने कृषी कायद्यांविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून  पक्षाच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीचे निवेदन दिले.  त्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  केंद्र सरकारचा निषेध केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्राने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे.

हे काळे कायदे पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे,  याबाबत केंद्राशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्यात अंमलबजावणी करायची की नाही, याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल असे त्यांनी सांगितले.

आंदोलनावर करोनाचे सावट

राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील हे करोनाबाधित झाले आहेत.  शुक्रवारी  २५ सप्टेंबर रोजी ते मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यपालांची भेट घेतली नाही, असे सांगण्यात आले.