गृहनिर्माणमंत्र्यांची थेट चर्चा

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रकल्प पुढे सरकण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना यश आले आहे. त्यामुळे आता हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मागण्या मान्य झाल्याशिवाय सर्व्हे करू दिला जाणार नाही, अशी भूमिका चाळवासीयांनी घेतली होती. तोपर्यंत गृहनिर्माण मंत्र्यांना फिरकू देणार नाही, अशी धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे बीडीडी चाळवासीयांशी चर्चा करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री थेट ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीत आले. आधी करारनामा मगच पुनर्विकास, अतिक्रमण व निष्कासन विभागाचा सव्र्हे तसेच १९९६ च्या आधीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी चाळवासीयांच्या वतीने अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी मांडल्या. या सर्व मागण्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र या मागण्या आव्हाड यांनी मान्य करून याबाबत लवकरात लवकर सरकार शासन निर्णय जारी करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय इतर सर्व मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले.

आतापर्यंत आश्वासने खूप झाली. परंतु जोपर्यंत हातात लेखी जीआर पडत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास वेगाने व्हावा, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. या रहिवाशांच्या काही मागण्या प्रलंबित होत्या. त्यातच मंत्र्याला आम्ही फिरकू देणार नाही, अशी ओरड काही घटक करीत होते. त्यामुळे आपण थेट बीडीडी चाळीत गेलो आणि गाऱ्हाणे ऐकले. याबाबत शासन निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री